मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज धुळे येथे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक, औद्योगिक व इतर उपक्रमांचे उदघाटन व भूमिपूजन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अन्न, वस्त्र आणि निवारा यांसोबतच आजच्या काळात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या गरजाही तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत आणि या सर्व गरजांची पूर्तता आमदार अमरीश पटेल यांनी शिरपूरमध्ये करून दाखवली आहे. शिरपूरमधील शाळा आणि महाविद्यालये अत्यंत आधुनिक व दर्जेदार आहेत. 21व्या शतकात उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज असते आणि शिरपूरसारख्या भागातून उत्कृष्ट मानव संसाधन घडवले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात अनेक अत्याधुनिक रुग्णालये आहेत आणि आता शिरपूरमध्येही आधुनिक सुविधा असलेले रुग्णालय सुरू झाले आहे. आदिवासी समाजाच्या कल्याणाची संकल्पना अमरीश पटेल यांच्या शैक्षणिक उपक्रमांतून प्रभावीपणे राबवली जात आहे. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते आणि हीच क्षेत्रे विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. तसेच, जलसंधारणाचे आदर्श मॉडेल शिरपूरने महाराष्ट्राला दिले आहे.
शिरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल. धुळे जिल्ह्यात सुमारे ₹40,000 कोटींची गुंतवणूक आणली असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. पुढील औद्योगिक केंद्र म्हणून धुळे आणि नंदुरबार उदयास येतील. गुंतवणुकीसाठी अनेक उद्योगसमूह पुढे येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धुळे जिल्ह्यात ग्रीन पॉवर निर्मितीवर भर दिला जात आहे. आदिवासी बांधवांना मिळालेल्या वनजमिनीच्या पट्ट्यांबाबत निर्णय घेऊन, महसुली जमिनीप्रमाणेच सर्व शासकीय योजनांचा लाभ वनपट्ट्यांनाही मिळेलअसा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच एमआयडीसीसाठी पुढाकार घेतला जाईल आणि अरुणावती नदीवर बंधारे उभारण्याच्या मागणीला मान्यता दिली जाईल.
यावेळी मंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिश पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.
